Tuesday, April 1, 2008

दिशा : (संपूर्ण कथा)

-x दिशा (कथा) x-
माझ्यासमोरच दादा आणि वहिनी बसले होते. एक मोठाच कूटप्रश्न सोडविण्यास आम्ही तिघे बसलो होतो. खरं तर हा दादा आणि वहिनींचा खाजगी प्रश्न होता; आणि तो सोडविण्यासाठी माझ्यासारख्या अवघ्या विशीतल्या तरूणाची मदत दादाने घ्यावी याचेच मला जरा जास्तच आश्चर्य वाटत होते. कारण वहिनीला घरात येऊन तीन वर्षे झाली होती. आणि या तीन वर्षांत वहिनीला दादापासून अजूनही मूल झालेले नव्हते. याच संदर्भात ते दोघं कालच डॉक्टरांकडे जाऊन आले होते. गेले महिनाभर दादा आणि वहिनी वेगवेगळ्या प्रकारच्या मेडीकल टेस्ट करुन घेत होते. आणि कालच डॉक्टर अवस्थी, जे आमचे फॅमिली डॉक्टर होते.यांच्याकडे ते दोघं रिपोर्ट घेण्यासाठी गेले होते. अर्थात मला या गोष्टीशी फारसं देणं-घेणं नव्हतं. मी माझ्याच उद्योगात मग्न होतो.
"हा डॉक्टरांचा रिपोर्ट" - माझ्याकडे रिपोर्ट सरकवत दादा म्हणाला. मी रिपोर्ट उघडून पाहिला. वेगवेगळ्या चाचण्यांचे शेरे लिहिलेले होते. अर्थात ते डॉक्टरी भाषेत असल्याने माझ्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे होते. फक्त शेवटची ओळ मात्र मला समजली. मलाच काय, कोणालाही त्याचा अर्थ समजला असता. अवघी एकच ओळ. पण त्या ओळीने माझ्या दादाच्या संसारातलं सुख हिरावून घेतलं होतं. ती ओळच अशी होती. - "श्री.ऋषिकेश देशमुख संतती निर्माण करण्यास असमर्थ आहेत." ही ओळ वाचून मी तर सुन्नच झालो. आता कुठे मला दादानं कशाला बोलावलं असावं याची अंधुक अंधुक कल्पना येऊ लागली.
ऋषिदादा माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता. बाबा मल्हारराव देशमुख शहराचे पोलिसप्रमुख होते. ऋषिदादाला पोलिसदलाचा मनापासून तिटकारा होता. त्यामुळे तो शक्य असून पोलिसदलात गेला नाही. बाबा असताना ऋषिदादा मोठ्या पदावर सहजपणे गेला असता. पण दादाला स्वत:च्या पायावर उभं रहायचं होतं. आणि आपल्या मुलाने आपल्या ओळखीवर मोठी नोकरी मिळवावी हे बाबांनाही पसंत नव्हतं. नाहीतर बाबांच्या इतक्या ओळखी आहेत की ऋषिदादाला कुठेही विनाकष्ट नोकरी मिळाली असती. बाबा जरी शहर पोलिसप्रमुख असले तरी ते सत्याच्याच मार्गाने जाणारे होते. त्यामुळे इतर कोणाही पोलिसप्रमुखाच्या घरी दिसली असती तशी श्रीमंतीची लक्षणं आमच्या घरात नव्हती.

बाबांना मिळणार्‍या पगारातून घर व्यवस्थित चालत होतं आणि आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न बाबांनी कधीच केला नव्हता। त्यापेक्षा बाबांनी सर्वसामान्यांच्या आयुष्याला सुरक्षितता देणं हे आपलं कर्तव्य मानलं होतं। आणि पोलिसप्रमुखाकडून हीच तर अपेक्षा असते सर्वसामान्यांची।

लवकरच दादाने त्याची पात्रता सिद्ध करुन दाखविली. बावीसाव्या वर्षी तो टेल्कोत नोकरीला लागला व २ वर्षात विभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवली व परमनन्ट देखील झाला. लगेच आईने त्याचे लग्न उरकून टाकले. वहिनीला पाहता क्षणीच ती मला खूपच आवडली होती. गोरीपान, गोबरे गाल, हसताना गालाला पडणारी नाजूक कळी, लालचुटूक ओठ, हसताना समोरच्या व्यक्तीवर छाप पाडणार्‍या पांढर्‍याशुभ्र दंतपंक्ती. अंगाने वहिनी बर्‍यापैकी भरलेली होती. पण त्यामुळे ती लट्ठ न वाटता आकर्षकच वाटायची. वहिनीच्या घरी तिला पाहायला मी, आई,बाबा व दादा गेलो होतो. तेव्हाच मी आईला म्हणालो की, वहिनी मला एकदम पसंत आहे म्हणून. यावर आईनं मला दटावलंही होतं - "लग्न तुझ्या दादाचं ठरवायचं आहे तुझं नव्हे.."

"समीर, तुला कसं सांगावं तेच कळत नाहीये. सांगताना मनाला खूप यातना होत आहेत. पण आपल्या घराण्याची, माझी समाजातील अब्रू वाचवण्यासाठीच हे सर्व करणं मला भाग पडत आहे." ऋषि दादा अगदी दीनवाणा चेहरा करुन बोलत होता. "मधुरादेखील या गोष्टीला मोठ्या मनाने तयार झाली आहे. खरंतर कोणतीच स्त्री या गोष्टीला तयार झाली नसती. पण केवळ माझ्या प्रेमाखातर, आपल्या घराण्याची अब्रू वाचावी म्हणून मी तिला तयार केलंय" समीर मला तू एक अपत्य दे. पाहिजे तर मी हात पसरतो तुझ्यापुढे" बोलताना दादा सद्-गदीत झाला होता. मलाही खूप वाईट वाटले की दादावर अशी वेळ यावी. दादा बोलतच होता - "कृत्रिमरित्या गर्भधारणा करवून घेतली असती मी मधुराला. पण दुसर्‍या कोणाचं बीज मी माझ्या घरात वाढू देणार नाही. तुझंही बीज कृत्रिमरित्या मधुरा धारण करु शकली असती. पण मी ठरलो कर्मठ माणूस. या शास्त्रीय पद्धतींवर माझा मुळीच विश्वास नाहीए. कृत्रिमरित्या गर्भधारणा करवून मुलाला जन्म दिला तरी मधुरा आणि मी त्याच्याशी कितपत भावनाशीलतेने वागेन याविषयीही मी साशंकच आहे. अशा मुलाला परत आमच्याबद्दल ओढ , माया राहीन की नाही याबद्दलही शंका घेण्यास जागा आहेत."

जन्मणारं अपत्य नैसर्गिकरित्या पुरुष आणि स्त्रीच्या समागमामुळे जन्म घेणार असेल तरच ते जाणीवा, भावना उपजतच असणारं मूल असतं अशी माझी श्रद्धा आहे. मधुरा चांगली सुदृढ आहे. तूही चांगला कमावत्या शरीराचा आहेस. दोन सुदृढ , सशक्त शरिरांच्या मिलनातून जन्माला येणारं बालक सुदृढ असणारच. मला अपत्य हवंय ते माणूस म्हणून जगणारं हवं आहे, आपल्या वंशाची परंपरा पुढे चालवणारं हवं आहे. दगडी हृदयाचं अपत्य जन्माला घालून मला पश्चात्ताप पावायचं नाहिये." दादानं स्वत:ला आता बरंच सावरलं होतं. शांत पण निश्चयी स्वरात तो बोलत होता - "संयोगापूर्वी तुम्ही दोघांनी माझ्यासमोर शपथ घ्यायला हवी की संयोगानंतरही तुम्ही दोघं एकमेकांत गुंतणार नाहीत म्हणून."

मी लगेच म्हणालो - "दादा कशाला शपथेच्या भानगडीत पडतोस? मूल नसलं तर काय बिघडतं तुझं?"

"समीर, तुझ्या लग्नाला तीन-चार वर्षे झाल्यावरही जर तू बाप झाला नाहीस व लोकांनी तुला षंढ म्हटले तर तुला कसे वाटेल? " दादा विषण्ण मनाने उत्तरला.

"समीर, अरे ह्यांचं म्हणणं बरोबर आहे"" वहिनीदेखील दादाचीच 'री' ओढत म्हणाली-"मलाही आधी असेच वाटत होते की एखादे मूल दत्तक घ्यावे. पण तूच विचार कर. तुझे वडील आपल्या शहराचे पोलिसप्रमुख आहेत. ज्यांनी शहरातल्या गुंडगिरीला आळा घातला व शहरातल्या प्रत्येक नागरिकाला निर्भय आयुष्य जगायची संधी व हिम्मत दिली त्यांचा मुलगा षंढ निघाला हे लोकांना कळाले तर आपली किती छिं-थू होईन. आपल्याला कोणी किंमत देईन का? मलाही अनेक बायका वांझ म्हणून हिणवतात व टोमणे मारत असतात. मी ही जन्मभर निपुत्रिक म्हणूनच का जगावं? आई होण्याचा माझा अधिकार नाहिये का? वरवर दिसायला हे अतिशय साधे-सोपे प्रश्न वाटतात. पण या प्रश्नांच्या अनुभूतीत शिरुन विचार केला तर हे कटू सत्य पचवणं किती जड आहे याची लगेच जाणीव होते. तूच विचार कर, ही वास्तवता तू सहन करु शकला असतास का?

वहिनीच्या ह्या सडेतोड स्पष्टीकरणाने माझा नकार तर सप्त पाताळांखाली गाडला गेला होता. खरंच मी ही वास्तवता सहन करु शकलो असतो का? तर 'नाही' हेच उत्तर मला मिळत होते. तसा मी शांत प्रवृत्तीचा पण मला कोणी षंढ म्हणालेलं काही मी ऐकून घेतलं नसतं.

"संयोगानंतर आम्ही एकमेकांत गुंतणार नाही" ही शपथ घेताना मला कन्नड साहित्यिक 'एस.एल. भैरप्पा' यांच्या 'पर्व' या महाभारतावर आधारीत कादंबरीतील प्रसंग आठवला. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पांडुराजा 'उत्तर-कुरु' या प्रदेशातील देव गणाचा धर्माधिकारी याला कुंतीशी नियोग करण्याची विनंती करतो. त्यावेळी हीच शपथ पांडुराजाने धर्माधिकारी व कुंती यांच्याकडून घेतली होती.

आई-बाबा परवाच दोन महिन्यांच्या 'दक्षिण-भारत'च्या यात्रेला गेले होते. त्यामुळे आमचं तीन खोल्यांचं घर बरंच मोठं भासत होतं. मी आणि वहिनी त्या रात्री बेडरुममध्ये गेलो. दादा हॉलमधे झोपणार होता. खोलीत शिरताना आमच्या दोघांची मने कर्तव्याच्या भावनेने भारलेली होती. पण जसजसं वहिनीचं सौंदर्य माझ्यापुढे उघडं पडलं व माझ्या सहवासात शरीरसुखाचा आनंद वहिनीला मिळू लागला तसतशी आमच्या दोघांच्या मनातली कर्तव्यपालनाची पवित्र भावना नष्ट झाली. पहाटेपर्यंत मधुरा [होय मधुराच म्हणणे योग्य. कारण त्या काळरात्रीने माझ्यात आणि मधुरात असलेलं दीर-भावजय हे नातंच मिटवून टाकलं] माझ्याशी लगट करत होती. शेवटी थकल्यामुळे पहाटे कधीतरी आम्ही दोघेही निद्रादेवीच्या अधीन झालो.

सकाळी आम्ही बाहेर येताना दादा आम्हा दोघांकडे संशयाने पहात होता. पण बाहेर येतानाच दादापुढे कसं वागायचं हे मी आणि मधुराने ठरवलं होतं. त्यामुळे लगेच त्याच्या चेहर्‍यावरचा संशय दूर झाला. "समीर, माझ्या भावा.... मला तू केवढ्या मोठ्या मानहानीपासून वाचवलं आहेस याची तुला कल्पना नाही. मी जन्मभर तुझा ऋणी राहीन." दादाचे हे शब्द ऐकून मी निर्विकारपणे माझं फुटबॉलचं किट उचललं आणि ग्राउंडवर खेळायला गेलो...

सुमारे दोन महिन्यांनंतरः
आई-बाबा कालच परत आले होते. या दोन महिन्यांत दादा घरात नसताना मधुरा कायमच माझ्या सहवासात असायची. त्यामुळे आम्ही हवे ते करु शकत होतो, वाटेल तसे बोलू शकत होतो. पण काल आई-बाबा आल्यापासून आम्हाला एकमेकांकडे बघायचीदेखील चोरी झाली होती. महत्प्रयासाने आम्ही एकमेकांना सावरत होतो. माझा सहवास मिळवण्यासाठी मधुराची चाललेली तडफड पाहून मला पुन्हा एकदा वाचत असलेल्या 'पर्व' कादंबरीतील कुंती आणि माद्री यांची आठवण आली. "दोघीही सौंदर्यवती. पण नियोग करताना त्यांच्या मनात शरीरसुखाची प्राप्ती हे ध्येय असेन का अपत्यप्राप्ती? बराच वेळ विचार करुनही हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. शेवटी मीच कंटाळून तो विचार बाजूला सारला.

सुमारे सात महिन्यांनंतरः
घरात जरी मी मधुराला वहिनी म्हणत असलो तरी आम्ही जेव्हा एकांतात भेटू तेव्हा मी तिला मधुराच म्हणत असे. त्या रात्रीचे की कोणत्या दिवसाचे माहित नाही पण माझे व मधुराचे मिलन सफल झाले होते. मधुरा आता कोणत्याही क्षणी बाळंतीण होणार होती. गर्भाचे नऊ महिने भरत आले होते. आई-बाबा देखील वंशाला दिवा मिळणार म्हणून खूप आनंदात होते. मी मात्र रोज संध्याकाळी शिवमंदीरात 'आनंदस्वामीं'चे प्रवचन ऐकायला जाऊ लागलो होतो. आनंदस्वामी तीन महिने रोज सायंकाळी प्रवचन करणार होते. कालच पहिले प्रवचन मी ऐकले होते. त्यांच्या पहिल्याच प्रवचनाने मला पूर्ण भारुन टाकले होते. स्वामीजींची समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुरस आणि श्रवणीय होती. पहिल्याच प्रवचनाच्या वेळी मी ठरवले की आनंदस्वामीजींची सर्व प्रवचने ऐकायची

"स्वतःचा उद्धार करायचा असेल तर संसारचक्राच्या मोहात न अडकता कर्तव्यबुद्धीने वागून योगमार्ग अनुसरला पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात सात चक्रे असतात. कुंडलीनी शक्ती प्रथम जागृत करायची असते. त्यानंतर प्राणाचा कुंडलीनीत वा ब्रह्मरंध्रांत प्रवेश करवून तेथे तो स्थिर करावयाचा असतो. त्यानंतर एकामागोमाग एक अशी सात चक्रे भेदण्यात जो यशस्वी होतो तो ब्रह्म जाणतो. व जो ब्रह्म जाणतो तो संसारमायेच्या चक्रातून मुक्त होऊन चिदानंदाचा अनुभव घेतो" असा साधारणतः आनंदस्वामींच्या प्रवचनाचा सारांश होता.

अजून दोन महिन्यांनंतरः
मधुराला मुलगा झाला होता. त्या दिवशी मी खूपच आनंदीत झालो होतो. माझा स्वतःचा अंश आपले इवलेसे हात-पाय हालवत माझ्याकडे सारखा बघतोय याचंच मला तेव्हा खूप अप्रूप वाटायचं. वाटायचं की हेच ते संसारसुख ज्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुष लग्न करतात. पण आता मला तसलं काहीच जाणवत नाही. आनंदस्वामींच्या प्रवचनांचा परिणाम होता हा. खरंतर हिमालयातल्या योग्यांविषयी मी बरंच काही वाचलं होतं. त्यातच 'जी.के. प्रधान' यांची 'साद देती हिमशिखरे' व कन्नड साहित्यिक 'एस्.एल. भैरप्पा' यांची 'निराकरण' ही दोन पुस्तके माझ्या वाचनात आली होती. तेव्हा तर मला घर-दार सोडून हिमालयात जावं असे खूप वाटत होते. पण मी गेलो नाही. एक तर मी गेलो तर आपल्यामागे आई-बाबा, दादा-मधुरा यांचे काय होईल याची चिंता होती. शिवाय मधुराच्या पोटी जन्म घेणार्‍या माझ्या मुलाला बघायचीही इच्छा होतीच. हे सर्व आठवल्यावर मला आनंदस्वामींच्या एका प्रवचनाची आठवण झाली. आनंदस्वामी म्हणाले होते-"माया हे ब्रह्माचेच एक रुप आहे. ज्याला ब्रह्म जाणून घ्यायचे आहे त्याने मायेचा त्याग केला पाहिजे. या जगात मी नसलो तर इतरांचे काय होईल हा विचार मनात येणे म्हणजे मायाजालात आपणहून अडकणे. म्हणूनच मी सांगतो लोकहो योगसाधना करा. योगमार्गच तुम्हाला मायेपासून दूर नेण्यास मदत करेन.

गेले दोन महिने आनंदस्वामींची प्रवचने ऐकून मी माझ्या शंका आनंदस्वामींपुढे बोलून दाखवत असे. प्रवचन चालू असताना सर्व लोकांसमोर स्वामीजींना प्रश्न विचारायला मला संकोच वाटत होता. म्हणून मी प्रवचनानंतर आनंदस्वामींना माझ्या शंका विचारत असे. कारण मला अनुभवच तसा आला होता. पहिल्याच प्रवचनाच्या वेळी मी स्वामीजींना विचारले होते - " अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे नक्की काय करायचे स्वामीजी? " मी प्रश्न विचारला तेव्हा सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले. काय वेडगळ प्रश्न विचारतोय अशा थाटात सगळे माझ्याकडे बघत होते. एक तरुण मुलगा अध्यात्म या विषयावर प्रश्न विचारतोय हे लोकांना पटतच नव्हते. मला एकदम संकोचल्यासारखं झालं होतं. माझी ही अवस्था ओळखूनच जणू स्वामीजी म्हणाले होते - " वत्सा, प्रवचनानंतर मला भेट. तुझ्या शंकेचं मी निरसन करुन देईन." आणि त्या अनुभवापासून मात्र मी शहाणा झालो. प्रवचन चालू असताना मी स्वामीजींना कधीच प्रश्न विचारले नाहीत.

प्रवचनानंतर मी त्यांना माझ्या शंका बोलून दाखवायचो. आनंदस्वामीदेखील माझ्या शंकांना न थकता प्रसन्न वदनाने उत्तरे देत असत. माझ्या या शंकांचा वा प्रश्नांचा भडीमार मी जो स्वामीजींवर करायचो त्यामुळे मी व आनंदस्वामी खूप जवळ आलो होतो. आनंदस्वामींच्या सहवासात माझं मन विरक्त होत चाललं होतं. ते सांगत असलेल्या प्रत्येक योगसाधना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करीत होतो. ते नेहमी म्हणत, "अरे योगसाधना ही फक्त पहिली पायरी आहे. बरेच जण योग आला म्हणजे अखिल सृष्टीचे ज्ञान झाले असे मानतात, ते काही बरोबर नाही. खरा कस तर पुढेच लागतो." मन स्वस्थ करण्यासाठीच आनंदस्वामी माझ्याकडून योगसाधना करवून घेत होते. पण आज सकाळीच पाहिलेल्या दृश्याने तर माझ मन खूप अस्वस्थ झालं होतं. जिला मी आपली म्हणत होतो, जिच्या पोटी माझा अंश जन्माला आला होता, ती मधुरा मला दुसर्‍या पुरुषाबरोबर दिसली होती.

सकाळी ग्राऊंडवरुन फुटबॉल खेळून घरी येत असताना नऊच्या सुमारास मधुरा मला जाताना दिसली. मला वाटले भाजी आणायला चालली असेन. पण कोणी आपल्याला बघत तर नाहीए ना अशी सर्वत्र नजर फेकत ती जात होती. त्यामुळेच मला संशय आला व मी मधुराच्या नकळत तिच्या मागे गेलो. मी व मधुरा नेहमी ज्या लॉजमध्ये जायचो त्याच लॉजमध्ये ती गेली. ती २० नंबरच्या रुम मधे गेल्याचे मी पाहिले होते. ते हॉटेल बरेच जुनेपुराणे होते त्यामुळे तिथे लोकांचा वावर तितकासा नसायचा. मी सहज खिडकीच्या फटीतून जे दृश्य पाहिले त्यावर माझा विश्वासच बसेना. मधुरा एका तरूणाच्या मिठीत पूर्णपणे विवस्त्रावस्थेत होती. त्याच क्षणी माझी कानशिलं गरम झाली व रागाने माझा ताबा घेतला. त्याच क्षणी मी तेथून निघालो व तडक आनंदस्वामींच्याकडे आलो.

"काय रे अजूनही इच्छा आहे का मदुराशी संबंध ठेवायची?" मी पोहोचताच आनंदस्वामींनी प्रश्नाचा बाँबच टाकला. मी एकदम सटपटलोच. कारण माझं हे मधुरा प्रकरण मी आनंदस्वामींनाच काय पण कोणालाच सांगितलं नव्हतं. आनंदस्वामी हे योगी होते. त्यांचा आरोप नाकारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. पण तरी मी म्हणालो-"स्वामीजी तुम्हाला हे कसं समजलं?" त्यावर आनंदस्वामी हसत उत्तरले-"लेका, मी हिमालयात आलेले अनुभव, केलेल्या साधना, प्राप्त झालेल्या सिद्धींविषयी केलेलं विवेचन सारं काही विसरलास का?" मला एकदम शरमल्यासारखं झालं. मधुराने केलेला विश्वासघात मला अस्वस्थ करत होता. शिवाय घरात आई-बाबांबरोबरही शाब्दीक चकमकी अनेक घडत होत्या. आई तर मला माझ्या बाळाला हातही लावू देत नव्हती.

माझं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. तसंच ते विरक्तही झालं होतं. आता कसलीच आसक्ती उरली नव्हती. संपूर्ण आयुष्य योगाभ्यासात समर्पित करुन टाकावं अशी आंतरिक इच्छा आता मनात निर्माण होऊ लागली होती. तेव्हाच मी घर सोडून आनंदस्वामींच्या बरोबर जायचा ठाम निश्चय केला. थोडा वेळ मी स्वामीजींपाशी बसून घरी जायला निघालो...

सुमारे एक महिन्यानंतरः
कालच मी हे शहर सोडलं. आनंदस्वामींबरोबर. घरात माझ्या लिहिण्याच्या टेबलावर फक्त एका ओळीत चिठ्ठी ठेवली होती. करायचं काय या शहरात राहून? आनंदस्वामींनी सांगितल्याप्रमाणे मला जर योगमार्ग स्वीकारायचा असेल तर मायेतून मुक्त होणं आवश्यक होतं. मायेतून मुक्त होण्यासाठी मुख्य कारणांनाच दूर लोटायचं होतं. त्याप्रमाणेच मी हे घर सोडलं. मी घर सोडणार आहे हे फक्त मी आनंदस्वामींनाच सांगितलं होतं - एक महिन्यापूर्वीच. योगमार्गात गुरु हा अत्यावश्यकच असतो. कारण योगमार्गातील धोक्याच्या जागा दाखवून देणारा, सिद्धी प्राप्त झाल्यामुळे मनात अहंकार निर्माण होऊन भरकटलेल्या साधकाला परत मार्गावर आणणारा फक्त 'गुरु'च असतो. त्यामुळेच मी आनंदस्वामींचे शिष्यत्व पत्करले होते. आनंदस्वामीदेखील मी त्यांचा शिष्य झाल्यामुळे प्रफुल्लित दिसत होते.

संसारात रहायचं कशासाठी? तर लग्न करायचे... आपला वंश वाढावा या आशेपोटी चार-दोन जीवांच्या जन्मासाठी कारणीभूत व्हायचे. दु:खाच्या वाटेवर सुखाचे कण शोधत कशीबशी जीवन-नौका ढकलायची. अंतिम सत्यापर्यंत जर मला पोहोचायचे असेल तर लग्नाच्या बंधनात अडकणे हितावह नव्हते. राहिली वंशाला दिवा देण्याची बात. तर मधुराच्या पोटी माझा अंश जन्माला आलाच आहे. वंशाला दिवा देण्यासाठी मला लग्नाच्या बंधनात अडकण्याची आवश्यकता नव्हती. माझा मार्ग आता मोकळा होता.

आनंदस्वामींबरोबर मी हिमालयात जाणार होतो. तिथे आनंदस्वामी माझ्यासाठी योगमार्गाचे प्रवेशद्वार खुले करणार होते. मला माझ्या जीवनाची योग्य दिशा सापडली होती. इतके दिवस अंधारात चाचपडत होतो. पण आता मात्र सारं काही माझ्या नजरेसमोर स्पष्ट झालं होतं. हे जीवन कशासाठी आहे? कशाला जगायचे? प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश काय? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे आता मिळणार होती...मला दिशा सापडली होती आणि आनंदस्वामी मला योग्य मार्गाने अंतिम सत्यापर्यंत पोहोविण्यासाठी मदत करणार होते.
मी आनंदस्वामींबरोबर जाताना पूर्णपणे आनंदी व समाधानी होतो. आजूबाजूचा निसर्गदेखील वातावरण प्रसन्न करण्यात हातभार लावत होता आणि माझी पावले मात्र ठामपणे पडत होती.... हिमालयाच्या दिशेने.... अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी...
- सागर भंडारे © २०००-२००८ , सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत