Wednesday, August 12, 2009

जगबुडी ( कथा)

मित्रांनो,
नौस्ट्रेडेमस ने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे जगबुडी कशी होते यावर आधारित ही कथा आहे.
माझ्या ’जगबुडी’ ह्या कथेचे हस्तलिखित सापडत नाहिये. सापडले की ही कथा पण देईन.
धन्यवाद,
सागर

Tuesday, July 21, 2009

सूड (संपूर्ण कथा)

संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.

~ प्रस्तावना ~

कथा अर्थातच पूर्णपणे काल्पनिक आहे...कोणत्याही गोष्टीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा...इ..इ..आहेच. पण ही कथा वाचण्यापूर्वी माझी भूमिका वाचकांना कळावी असे वाटले म्हणून हे दोन शब्द.भर तारुण्यात प्रवेश करणार्याा युवकाच्या मनःस्थितीचा विचार समोर ठेवून हे कथानक लिहिले आहे. यातील काही व्यक्तीरेखांवर मी स्वत: पाहिल्या असलेल्या व्यक्तींचा प्रभाव असल्याची शक्यता मी नाकारत नाही. पण लहान सहान गोष्टींवरुन टोकाची भूमिका घेणारे अनेक लोक मी स्वतः पाहिले आहेत्...अनुभवले आहेत... आपले स्वतःचेच उदाहरण घ्या ना... घरचा नळ खराब झाला आहे आणि प्लंबर २-३ वेळा येऊनही काम नीट झाले नसेल तर आपण काय करतो? रागाने अंगाचा तिळपापड होतो खूप. त्या प्लंबरच्या डोक्यात हातोडा घालतो आपण. पण ते मनातल्या मनात. मुकाट्याने आपण लगेच दुसरा प्लंबर शोधतो की नाही? आपला कथानायक मनात आलं की करुन टाकतो... पण योग्य वेळी तेवढा संयम आपल्या कथानायकात नक्कीच आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लेखक स्वत: स्त्रीचा खूप आदर करतो. या कथेत दाखवलेले ’सविता’चे पात्र केवळ एका विशिष्ट प्रकारच्या मनोवृत्तीचे द्योतक आहे... तेव्हा सर्व स्त्री वाचकांना विनंती की गैरसमज करुन घेऊ नये. हीच कथा स्त्रीच्या भूमिकेतूनही लिहिता येईन.

थोडे चाकोरीबाहेरचे कथानक असलेल्या ह्या कथेमुळे वाचकांचे किती मनोरंजन झाले हे वाचकांनीच ठरवावे. आपल्या सूचना व अभिप्राय यांची अपेक्षाही आहे आणि त्यांचे स्वागतही...
~सागर भंडारे~
*****************************************











~ सूड ~

आज मी समाधानानं माझी ही सूडकथा तुम्हाला सांगतोय. माझ्यावर जो प्रसंग आला होता त्या परिस्थितीत दुसरा कोणी असता तर जाऊ दे म्हणून माघार घेतली असती. काही माणसे आपल्या तत्त्वांशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात म्हणूनच की काय या व्यावहारीक जगात मानमरातब, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी त्यांना बघायलाही मिळत नाहीत. आहे त्यात संतुष्ट राहण्याकडे त्यांचा कल असतो. पण त्याउलट असेही दिसते की आपल्या या तत्त्वांच्या आधारेच काही जण प्रसिद्धी, पैसा व मानमरातब या सुखांचा उपभोग घेत असतात. मी माझी गणना पहिल्या प्रकारात करतो. असो... तर आता मी माझ्या कथेकडे (माफ करा सूडकथेकडे) वळतो.
तर माझा स्वभाव हा असा असल्याने त्या छोट्याशा प्रसंगाने माझ्या स्मृतिकोषातील बरीच जागा व्यापली होती. कोवळ्या मनावर झालेले घाव वयाबरोबरच अधिक दृढ होतात असे म्हणतात याचे प्रत्यंतर किमान माझ्या स्वतःच्या बाबतीत तरी मला आले. कोवळ्या वयात घडलेला तो साधा क्षुल्लक प्रसंग. पण तो प्रसंग माझ्या पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. शाळेत मी दहावीत असताना घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर अगदी आत्ताच घडल्यासारखा तरळतोय. पण प्रसंग सांगण्याआधी त्यामागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो.....
२० जून १९८९
एस.एच.एस.पी. हायस्कूल, पुणे
आज शाळेचा पहिला दिवस होता. काय होईल अन् काय नाही याची उत्सुकता इतर मुलांप्रमाणेच मलाही लागून राहिली होती. शाळा भरल्याची घंटा वाजली आणि आम्ही सर्व मुले आपापल्या वर्गात पळालो. वर्गात आल्यावर मला दिसले की १०-१२ मुली वर्गात बसल्या आहेत. नववीपर्यंत शाळेला हे शहाणपण सुचलं नव्हतं आणि दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षात मुला-मुलींना एकत्र करण्याचं शहाणपण शाळेकडे कुठून आलं? असा मला मोठ्ठा प्रश्न पडला होता. अर्थात हिंदी चित्रपट पाहून प्रेमाच्या उदात्त विचारांनी भारावून गेलेल्या मुलांसाठी ही पर्वणीच होती. शाळेच्या निकालावर आता परिणाम होणार याची मला शंभर टक्के खात्री होती. आणि बोर्डाचा निकाल लागल्यावर माझा हा अंदाज खराही ठरला. पण निकालावर परिणाम होणार्या् विद्यार्थ्यांच्या यादीत माझाही समावेश असेल याची मला कल्पनादेखील नव्हती. तेव्हा मी अभ्यास एके अभ्यासच करणार, मुलींकडे बघणार नाही, वगैरे उदात्त विचारांनी भारला गेलो होतो. माझी ही भारलेली स्थिती पहिल्या दोन दिवसांतच खाली आली. शेवटी आपल्या वर्गात काय नमुने आहेत याची उत्सुकता होतीच की. पण खरंच मुली चांगल्या होत्या. पहिल्या दोन महिन्यांत बहुतेक सर्व मुली बर्याुच मुलांशी बोलू लागल्या होत्या. गुपचुप वह्यांची देवाण-घेवाण होऊ लागली होती. मधल्या सुट्टीत चर्चा झडू लागल्या. अर्थात त्या भाग्यवान मुलांमध्ये मी नव्हतो. का कुणास ठाऊक मला मुलींशी बोलण्यात भीती वाटायची.
एक दिवस मी मधल्या सुट्टीत गृहपाठ पूर्ण करत बसलो होतो, एकदम हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. मी सहज मान वर करुन पाहिले तर दोन मुली गप्पा मारताना दिसल्या. एक माझ्या वर्गातली होती. दुसरी मात्र दुसर्या् वर्गातली होती. मैत्रीणीशी बोलायला म्हणून ती आमच्या वर्गात आलेली होती. 'सविता' नाव होतं तिचं. त्या मुलीला मी पाचवीत असल्यापासून पहात होतो. पण आजचं तिचं हास्य मला अधिक भावणारं वाटलं. बस्स त्याच दिवसापासून आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यांत अर्थ शोधू लागले....
अरे! तिचं नाव सांगितलं एवढं लांबलचक प्रास्ताविक केलं. माझी स्वतःची माहिती द्यायला नको? मी 'सुंदर बोरुंदे'. सध्या जरी एका गॅरेजमधे काम करीत असलो तरी मी समाधानी आहे. डोक्यावर आता कुठलेही दडपण नाहीये. पाच वर्षांनंतर जरी मी सूड घेतलेला असला तरी आता संपूर्ण तारुण्य माझ्या हातात आहे. स्वतःच्या पायावर उभा राहील इतपत सामर्थ्य माझ्यात नक्कीच आहे...
+ + +
जानेवारी १९९० चा एक दिवस
सारसबाग, पुणे

"सुंदर, असे वाटते की हे दिवस संपूच नयेत. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?" तिच्या भावूक आवाजानं माझ्या काळजाला हात घातला.
"तसा विचार देखील मनात आणू नकोस सविता..." मी ही भावूक होत उद्गारलो.

+ + +
या प्रसंगानंतर शाळेची प्रिलियम परिक्षा चालू झाली. पण सविताच्या विचारानं माझ्या डोक्याचा एवढा भाग व्यापलेला होता की त्यात ज्ञानाच्या कणांनाही जागा नव्हती. शेवटी व्हायचे तेच झाले. नववीपर्यंत साठाच्या पुढे टक्के मिळवणारा सुंदर बोरुंदे दहावीच्या प्रिलियम परिक्षेत सहापैकी चार विषयांत पूर्णपणे नापास झाला. इतिहास्-भूगोल व संस्कृत हे आवडीचे विषय होते आणि अवांतर वाचन बरेच असल्याने त्यात पास होण्यास अडचण आली नव्हती. गणितात तर भोपळाच मिळाला होता. रिझल्ट मिळाल्यावर शाळा सुटली. आता परत कोणीही भेटणार नव्हतं. मी वर्गाबाहेर आलो व लगेच सविताच्या वर्गाकडे पळालो. लगेच मला सविता घाईघाईत वर्गाबाहेर येताना दिसली. ती आत्ता भेटली नाही तर तिला मी परत भेटू शकलो नसतो. कारण उद्यापासून शाळेला बोर्डाच्या परिक्षेपर्यंत सुट्टी लागणार होती.
"सविता... सविता" मी तिला हाक मारली. पण तिने मला पाहूनही पाठ फिरवली आणि चालू लागली. मला ते चमत्कारिकच वाटले तेव्हा. पण तरी मी पुढे सरसावलो. तिच्यासमोर थांबून तिचा मार्ग मी अडवला. "सविता आपली भेट आता कुठे होणार?"
माझ्या या प्रश्नावर तिनं पहिली कृती कोणती केली असेल तर ती माझ्या श्रीमुखात भडकविण्याची.
"माझ्यासारख्या सोज्वळ मुलीला असं बोलताना लाज नाही वाटत?"
तिचे हे शब्द ऐकून मला माझ्या पोटात भक्ककन पोकळी निर्माण झाल्याचं जाणवलं. डोकं सुन्न झालं. डोळ्यांत टचकन् पाणी आलं. प्रेमभंगाचा एवढा जबरदस्त धक्का मला पहिल्या-वहिल्या प्रेमातच मिळाला होता. प्रेमभंग म्हणजे काय? हे कथा-कादंबर्यांढतून बरंच वाचलं होतं. पण प्रत्यक्ष अनुभव सहन करताना मात्र मला खूप त्रास झाला. मुलीने मुलाच्या तोंडात मारली म्हटल्यावर बरीच मुलं जमा झाली होती. माझ्याजागी दुसरा कोणी असता तर त्याने सरळ तिच्या तोंडात भडकावून दिली असती. पण मी मात्र निमूटपणे तिथून सरळ घरी निघून आलो.
+ + +

घरी आल्यावर मी उशीत तोंड खुपसुन मनसोक्त रडलो. १ आठवडा मला काहीच सुचत नव्हते.या अपमानाचा सूड घेण्याचे मी तत्क्षणीच ठरवले. स्वतःला कसेबसे सावरुन अगदी थंड डोक्याने सविताने माझ्या निरागस प्रेमाचा केलेल्या अपमानाचा सूड घेण्याचा विचार करु लागलो. पूर्ण प्लॅन मी तयार केला होता. त्यात कुठेही चूक नव्हती. तो प्लॅन मी पाच वर्षांनंतर अंमलात आणणार होतो. संपूर्ण वेळापत्रक मी ठरवले होते. पाच वर्षे मी ह्या सूडाची तयारी करण्यासाठी दिले होते.
संपूर्ण सुट्टी मी अभ्यासावर केंद्रीत केली होती. मी माझ्या बुद्धीमत्तेच्या आणि रात्रंदिवस जागून केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पास झालो. पण साठाच्या ऐवजी इतर कोणाही सर्वसामान्य विद्यार्थ्याला मिळतात तेवढेच ५१ टक्के मिळाले. काहीच नसण्यापेक्षा हे बरं होतं. माझ्या हातात बोर्डाच्या परिक्षेचा निकाल देताना माझ्या वर्गशिक्षकाचा आ वासलेला चेहरा अजूनही मला आठवतो... नाहीतर काय ... चार विषयांत प्रिलियम मधे नापास झालेला मुलगा बोर्डाच्या परिक्षेत चक्क ५०% मार्क मिळवून उत्तीर्ण होतो हे आश्चर्यच होते त्यांच्यासाठी तरी. खास करुन त्यांच्या स्वतःच्या विषयात - गणितात - मला भोपळा असताना चक्क मला ७५ मार्क होते.
निकाल लागला. मला नू.म.वि. कॉलेजला अॅ डमिशन पण मिळाली. सकाळचं कॉलेज होतं. बारा वाजायच्या आत घरी येऊन मी एका इलेक्ट्रॉनिक्स् च्या दुकानात जात असे. सवितावर सूड उगवण्यासाठी मला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फार मदत होणार होती. जोडीला रोज सकाळी माझा जोर-बैठकांचा व्यायामही चालू होता. या व्यायामामुळे होणार्याच बलदंड शरीराचा उपयोग मला २ वर्षांनंतर गॅरेजकाम शिकताना होणार होता. माझं संपूर्ण लक्ष सवितावर होतं. तिचं लग्न व्हायची वाट मी पहात होतो. कारण कसबा पेठेसारख्या गजबजलेल्या वस्तीत तिच्या जवळपास जाणंदेखील अशक्य होतं.

ऑगस्ट १९९० ची एक पावसाळी सकाळ

सकाळी कॉलेजमधे जात होतो तेव्हा नुकतेच पावसाचे टपोरे थेंब पडू लागले होते. घराबाहेर पडतानाच पाऊस पडेल असे वाटत होते. आजच्यासारख्या आटलेला पाऊस ७-८ वर्षांपूर्वी नव्हता पडत. पाऊस कसा दमदार असायचा. पडला तर असा मुसळधार पाऊस पडायचा की जणू आभाळ खरोखर रडत आहे असा भास व्हावा ...तर मी अंगात रेनकोट अंगावर चढवूनच घराबाहेर पडलो होतो. एव्हाना मला सविताच्या घराबाहेर पडायच्या वेळा चांगल्या माहित झाल्या होत्या. फडके हौदापासून एक रस्ता थेट वसंत टॉकिजपाशी जातो. त्या रस्त्याने मी भरभर चालत होतो. तेवढ्यात ब्राह्मण समाजाच्या कार्यालयापाशी मला सविता एका उंचापुर्याि मुलाबरोबर दिसली. दोघे एका छत्रीच्या आडोश्याने चालत होते. मी पुरेसे अंतर राखून त्यांच्यामागून जाऊ लागलो. हात थंडीने गारठल्यामुळे मी ते रेनकोटच्या खिशात कोंबले होते. सविताने तीन-चार वेळा मागे वळूनही पाहिलं कोण येतंय म्हणून. पण मी मान खाली घालून चालत होतो. डोक्यावर रेनकोटचीच मोठी टोपी होती. त्यामुळे माझा बराच चेहरा झाकला जात होता. मान खाली घातल्यामुळे ती मला ओळखणार नाही याची खात्रीच होती... माझी नजर जमिनीकडे असली तरी कान मात्र दोघांच्या बोलण्याकडे होते. माझ्यात आणि त्यांच्यात जवळपास सात - आठ फुटांचे अंतर होते.



" किशोर असं वाटतं हे दिवस संपूच नयेत. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?"
सवितानं तिच्या त्याच भावूक आवाजात विचारलं हाच भावूक आवाज माझं काळीज भेदून गेला होता, बरोबर सात महिन्यांपूर्वी. तिच्या या प्रश्नाला मी मनातल्या मनात कुत्सितपणे हसलो. आणि तिच्याबरोबर असलेला तिचा मजनू काय म्हणतो याकडे मी उत्सुकतेने कान केले. हे प्रियकर महाशय तिला सांगत होते -
"सविता, जग विरुद्ध झालं तरी मी तुला सोडणार नाही. तुझ्यासाठी मी काहीही करेन."
त्या बिचार्यााची काय चूक म्हणा. 'सविता'च्या प्रेमात वाहून गेलेला 'किशोर'च तो. तिच्या भावूक आवाजामुळे भारावून तिच्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञा तो न करता तर नवलच होते.
+++
एप्रिल १९९२
नुकतीच माझी बारावीची परिक्षा संपली होती. म्हणावा तितका अभ्यास झालेला नव्हता. पण मी पास तर नक्कीच होणार होतो. आणि एकदा पेपर्स देऊन झाल्यावर रिझल्ट्चा तो काय विचार करायचा? कॉलेजमधे मी बरेच मित्र जमा केले होते. त्यात मी ज्या ग्रुप मधे असायचो तो तर कलहप्रिय मुलांचाच होता. कॉलेजची सगळी मुलं-मुली आमच्या ग्रुपला टरकून असायचे. मुलींची छेड काढणे, मारामार्याा करणे हे सारं सारं माझे मित्र करत होते. हे सगळे मित्र सिगारेट , दारु वगैरे व्यसनांत गुरफटले होते. मी मात्र या ग्रुप मधे माझं वेगळेपण टिकवून होतो. एक सज्जन, आदर्श असा मी एकमेव मुलगा या ग्रुपमध्ये होतो. माझे हे सर्व मित्र आया बहिणींवरुन सारखे एकमेकांना शिव्या द्यायचे. त्यांच्या तोंडात हे शब्द असले तरी मनात मात्र तसं नसायचं हे अनुभवावरुन मला माहित झालं होतं. केवळ संगत चांगली नसल्यामुळे ते तसे वागत होते. मला मात्र माझे हे मित्र बराच मान द्यायचे. जेव्हापासून मी या ग्रुपमध्ये आलो तेव्हापासून माझ्या मित्रांनी शिव्यांच्या भाषेत बोलण्याचे प्रमाण बरेच कमी केले होते.
सविता आता अकरावीला होती. दहावीत ती नापास झाली होती. मग बाहेरुन परिक्षा देऊन ती पास झाली होती. आमच्या कॉलेजजवळच तिचे कॉलेज होते. मी मनात आणलं असतं तर मित्रांना सांगून सविताला त्रास देऊ शकलो असतो. पण ही गोष्ट माझ्या स्वभावातच नाही. "जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमतीवर करायचं. त्यासाठी दुसर्या. कोणावर अवलंबून रहायचं नाही." हे माझं तत्त्व असल्याने मी मित्रांना माझ्या या सूडप्रकरणात भागीदार होऊ दिलं नव्हतं.
मी आता अभ्यासाच्या व्यापातून मोकळा झालो होतो. सुट्टी माझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मला खुणावत होती. मला हवे ते सहकार्य मिळवून देण्याचे मोठे काम या सुट्टीने केले. झाले असे की एक दिवस मी नेहमीप्रमाणे नगर वाचन मंदीराच्या वाचनालयात पुस्तक बदलून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदीराच्या बाहेरच थांबलो. दर्शन घेऊन मी परत जायला वळणार तेवढ्यात माझे लक्ष एका गृहस्थांकडे गेले. साधारण ४२-४५ वयाचे ते गृहस्थ होते. खिशातून रुमाल काढताना त्यांच्या खिशातून शंभराच्या नोटांचे एक बंडल पडले. पुणं कसं आहे ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही. त्यामुळे मी तत्परतेने पुढे होऊन ते नोटांचे बंडल उचलून त्या गृहस्थांना म्हणालो -
"सर ! तुमच्या खिशातून रुमाल काढताना हे पैसे पडले होते"
ते गृहस्थ चांगल्या सूटाबुटात होते. त्यामुळे मी त्यांना सर म्हणालो होतो. क्षणभर त्यांनी नोटांकडे पाहिले आणि माझ्याकडे पाहिले. मग एकदम लिंक लागल्यासारखे म्हणाले - " अरे थँक यू.. थँक यू ...."
ते गृहस्थ मला त्या बंडलातील शंभराची एक नोट देऊ लागले. मी नम्रपणे ते पैसे घेण्यास नकार दिला.- "हे माझे कर्तव्यच आहे .. वगैरे...वगैरे..."
एखादे सत्कृत्य केल्यानंतर भारावल्यासारखे मी माझे विचार प्रकट केले.
त्या गृहस्थांनी विचारलं-" काय करतोस?"
मी काय बोलणार?... सांगितलं - " सध्या बारावीची परिक्षा दिली आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत एका इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात शिकाऊ कामगार आहे. आणि आता संध्याकाळी गॅरेजचे काम शिकायचा विचार आहे."
"अस्सं आहे होय? अरे मग माझ्या गॅरेजमधे येत जा की. तुला माझ्या गॅरेजमधे भरपूर कामही मिळेल आणि पैसेही मिळतील"
मी आनंदाने तयार झालो. माझं लक फारच जोरावर असावं. प्रत्यक्ष परमेश्वरालादेखील माझा हा सूड कदाचित मान्य असावा. कुठल्याशा गॅरेजमध्ये काम शिकायचं होतं तर मला भेटलेला हा गृहस्थ चक्क सुप्रसिद्ध मेहेंदळे गॅरेजचा मालकच निघाला. एवढं मोठं गॅरेज म्हटल्यावर मला भरपूर काम मिळणार होतं. कष्ट उपसायला तर मी तयारच होतो. शिवाय पाचशे रुपये देखील महिन्याला मिळणार होते.
आता माझा दिनक्रम जवळजवळ ठरुनच गेला होता. सकाळी उठून पन्नास जोर-बैठका मारुन झाल्या की झटपट सगळं आवरुन नऊच्या आत मी दुकानात हजर होई. तीन वाजता काम संपलं की साडेतीन पर्यंत घरी येत असे. जेवण करुन थोडा वेळ आराम करायचो व साडेचार ला गॅरेजमध्ये जायचो. तन मन समर्पित करुन मी काम करायचो. घरी परत यायला रात्रीचे नऊ वाजायचे.
माझ्या या कष्टांचे आईला खूप कौतुक वाटायचे. आत्तापासूनच मुलगा कमवायला लागला हे ती फार अभिमानाने शेजार्यां ना आणि नातेवाईकांमध्ये सांगायची. पण माझे हे पाच वर्षांचे कष्ट एका सूडाच्या पूर्तीसाठी होते याची तिला तरी काय कल्पना म्हणा. मी देखील आईचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी मेहेंदळेंशी भेट झाली त्याच्या दुसर्याय दिवशी संध्याकाळी त्यांनी मला गॅरेजवर बोलावले होते. त्या दिवशी त्यांनी गॅरेजचे व्यवहार सांभाळणार्यार एका अनुभवी व्यक्तीशी माझी ओळख करुन दिली.
"बहुतुले... हा सुंदर बोरुंदे. आजपासून आपल्याकडे काम शिकणार आहे. आणि सुंदर..."
माझ्याकडे वळून मेहेंदळे म्हणाले - " हे साईराज बहुतुले. येथील सर्व कामगारांवर लक्ष ठेवायचे काम यांचं. आजपासून तुला शिकवण्याचं काम हे स्वतः जातीनं करतील. "
"बहुतुले तुम्ही या पोराला चांगलं तयार करा. पोरगं चांगलं आहे. चला मी निघतो आता.."
असं म्हणून मेहेंदळे तेथून निघून गेले. गॅरेजवर मेहेंदळे फारसे येत नसत. पण जेव्हा येत तेव्हा मात्र माझ्या प्रगतीची ते नेहमी चौकशी करायचे. हे बहुतुले मला उगाच हरभर्यासच्या झाडावर चढवायचे. म्हणायचे - " साहेब, पोरगं फार मेहनती आहे बर का... असेच हा काम शिकला तर कुठलेही बिघडलेलं वाहन हा दुरुस्त करु शकेन. " त्याच वेळी मी मनात म्हणायचो - " आणि कुठलेही चांगले वाहन बिघडवू देखील शकेन.."त्याचसाठी तर मी ही मेहनत घेत होतो. माझ्या मेहनतीचे मला विशेष काही वाटायचे नाही. कारण मी जेवढे कष्ट करतो तेवढेच कष्ट दुसरा कोणीही करु शकतो. फक्त आळस न करता माणसानं मन कामात गुंतवावं लागतं. बाकीचे कामगार काही या प्रवृत्तीचे नव्हते. फक्त पैशासाठी काम करायचे ते सर्व. काहीतरी शिकावे असे त्यांना वाटतच नव्हते. बहुतुलेंनी सांगितले हे कर की ते करायचे.
मी मात्र बहुतुलेंना सारखे विचारायचो - " हा बोल्ट नसेल तर काय होते?... ही वायर महत्त्वाची का? ... ब्रेक ची कार्यक्षमता कशावर अवलंबून असते?...असंच का करायचं? तसं केलं तर काय होईल?...इ...इ..." माझ्या चौकस स्वभावाला बहुतुले मुळीच न कंटाळता मला त्यांची उत्तरे द्यायचे व मी ही या ज्ञानाची नोंद माझ्या मेंदूत करुन ठेवायचो...
+ + +

मे १९९५

आजच परिक्षा संपली. रिझल्ट लागून मी पास झालो की पदवीधर होईन. सूड घेण्याची वेळ आता आली होती. ह्याच सुट्टीत मी एक इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार करणार होतो. तसा तो शोध माझाच म्हटला तरी चालेल. मी अनेक वेगवेगळे पार्टस एकत्र करुन ते उपकरण तयार करणार होतो.

मी सूड घेण्याच्या इर्ष्येने पेटून पाच वर्षे पूर्ण झाली होती. गेल्या तीन वर्षांत मी आता कोणतीही गाडी दुरुस्त करता येईल असा आत्मविश्वास मिळवला होता. परिक्षा जवळ आल्यामुळे मी मेहेंदळेंना सांगून गॅरेजमधून सुट्टी घेतली होती. परिक्षेनंतर २ महिने गावाला जाणार आहे असेही सांगितले होते. हे २ महिने मी पूर्णपणे स्वत:चा सूड घेण्यासाठी वापरणार होतो.. आता मी इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात सकाळी नऊ ते रात्री नऊ असा सलग १२ तास काम करायचो. मधे जेवणासाठी तासभर सुट्टी घेऊन घरी यायचो तेवढाच काय तो ब्रेक. माझ्या दुकानाचा मालक एक मुसलमान होता. दर शुक्रवारी माझा मालक काही दुकानात यायचा नाही. तेव्हा दुकान पूर्णपणे माझ्यात हातात असायचे. मी जाणून-बुजूनच असे दुकान निवडले होते की जिथे मला माझ्या प्रयोगांना वाव मिळेन. मात्र माझा मालक हुशार होता यात काही वाद नाही. त्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करायचे व दुरुस्त करण्याचे कौशल्य मान्य केलेच पाहिजे. त्यांच्या घरातला टी.व्ही. आणि टेपरेकॉर्डर (होय त्यावेळी सीडी प्लेयरची क्रेझ नव्हती.) त्याने स्वत: तयार केलेला होता.

मी एक रिमोट कंट्रोल तयार करणार होतो. आणि स्प्रिंगच्या आधाराने दोन धारदार पण छोटीशी पाती असलेली इलेक्ट्रॉनिक कात्री तयार करणार होतो...माझ्या हातातील रिमोटचे बटन दाबल्यावर स्प्रिंगला सेलची पावर मिळून झटका बसणार होता. त्यामुळे दोन पात्यांच्या मधे येणारी कोणतीही वस्तू झटकन कापली जाणार होती. माझ्या या वस्तू तयार करण्यासाठी काय काय लागेल हे मी आधीच माहिती करुन घेतले होते. त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या क्षमतेचे रेझिस्टर्स , डायोड्स , स्प्रिंग्ज वगैरे सर्व साहित्य घरी आणून ठेवत होतो. बरेचसे साहित्य मी काम करत असलेल्या दुकानातूनच आणत होतो.
पहिल्या शुक्रवारी मी रिमोट कंट्रोलचं सर्किट तयार करणार होतो. त्यासाठी लागणारी तांब्याची तार, एंटेना, एक छोटासा इलेक्ट्रिक चिप-बोर्ड व इतर वस्तू माझ्याकडे होत्या.सोल्डरगन मी दुकानातलीच वापरणार होतो.दुसर्‍या शुक्रवारी मी इलेक्ट्रीक कात्री तयार करणार होतो. आणि तिसर्‍या शुक्रवारी मी स्प्रिंग व सेल कात्रीला जोडून रिमोट वर चालते का नाही ते टेस्ट करणार होतो. साधारणपणे सविता चालवण्यार्‍या गाडीचे ब्रेक फ़ेल करुन तिला अपघाताने मारायचा माझा विचार होता.
+ + +

जुलै १९९५

माझे सर्व काम पूर्ण झाले होते.
आता फ़क्त मी माझी योजना अंमलात आणायचेच तेवढे बाकी होते. मी दहावीच्या त्या प्रसंगानंतर सविताची माहिती तुम्हाला सांगितलीच नाही का? ... आता सांगतो...

मी बारावीत गेलो तेव्हा ती अकरावीत होती. माझ्यासारख्या निष्पाप जीवाला फ़सवल्याची शिक्षा म्हणूनच की काय देवाने तिला दहावीत नापास केले अशी मी माझी समजूत करुन घेतली होती. तर मी बारावी झाल्यानंतर मला सारसबागेत एकदा ती दिसली होती. यावेळी तिच्याबरोबर एक वेगळाच पण हॅंड्सम तरुण होता. अजून दोन वर्षांनंतर मला कळाले की तिचा साखरपुढा झालाय. तेव्हा मी बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो. तिचा साखरपुडा जानेवारीत झाला होता. माझी परिक्षा संपल्यावर मी मोकळा झालो होतो, तेव्हा सविताची मी माहिती काढली तर कळाले की तिनं लव्ह?-मॅरेज केले आहे आणि ती पुण्यातच आहे. तिचा नवरा तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता पण श्रीमंत होता बर्‍यापैकी. सवितानं पैसा पाहूनच लग्न केले असणार याची मला खात्री होती. ती नवर्‍याबरोबर कोथरुडला फ़्लॅट संस्कृतीचा प्रभाव असलेल्या ठिकाणी रहात होती. ही गोष्ट माझ्या पथ्यावरच पडणार होती. कारण फ़्लॅट संस्कृतीतील लोक आपलं घर सोडून फ़ार कोणाशी विशेष संपर्क ठेवत नाहीत. शेवटी मी सवितावर लक्ष ठेवण्याचं ठरवलं.

मी भल्या सकाळीच बाहेर पडायचो. सकाळी सात वाजता सविता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडायची. मस्त फ़्रेश दिसायची ती. लिपस्टीक, पावडर लावून सविताचे मॉर्निंग वॉकला जाणे काही केल्या मला पटत नव्हते. तिचं हे मॉर्निंग वॉक म्हणजे नक्की काय? हे मला लगेच कळाले. सविता तेथून जवळच असलेल्या सुमार दर्जाच्या लॉजच्या एका रुम मधे जायची. आणि साधारणपणे आठ-साडे आठच्या सुमारास एखादी मिळत नसलेली गोष्ट मिळाल्याचा आनंद चेहर्‍यावर घेऊन ती एका बलदंड तरुणाच्या मागोमाग बाहेर पडायची.

सदाशिव पांढरे, सविताचा नवरा, त्याची कुठलीशी फ़र्निचरच्या कामाची फ़र्म होती. असली व्याभिचारी बायको त्याला मिळाली म्हणून मला तिच्या नवर्‍यासाठी खरेच वाईट वाटले होते. म्हणून मी त्यांना भेटून सविता कशी आहे ते सांगायला एका निवांत दुपारी त्यांच्या फ़र्मवर गेलो. फ़र्मचे शटर ओढलेले होते म्हणून सहज कोपर्‍यातल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून नजर टाकली तर तिथे मला भलतेच बघायला मिळाले. सदाशिवराव एका तरूण मुलीच्या शरीराचा उपभोग घेत होते. ती मुलगी नाराज दिसत होती पण चेहर्‍यावर नाईलाजाचे भाव दिसत होते. म्हटले आता पांढरे महाशयांवरदेखील लक्ष ठेवणे आले. आणि लक्ष ठेवून काढलेल्या सगळ्या माहितीने मला हादरवून सोडले.

तेथे अकाऊंटंट म्हणून काम करणार्‍या दोन गरीब मुली होत्या. हा हरामखोर पैशाच्या बळावर त्या दोन पोरींची शरीरे उपभोगायचा. मला त्या दोन गरीब मुलींविषयी खूप सहानुभूती वाटत होती कारण दोन्ही मुलींना वडील नव्हते आणि घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. केवळ पैशासाठी त्या दोन गरीब पोरींना आपल्या शरीराचा नैवेद्य पांढरे महाशयांना द्यायला लागत होता. संतापाची एक तिडीक डोक्यात आली. मी काही समाज सुधारण्याचा मक्ता नाही घेतला. पण समोर अन्याय होत आहे एवढे स्पष्ट दिसत असतानाही मी स्वस्थ बसणे अशक्य होते. गरीबीचा फ़ायदा घेऊन त्या दोन पोरींची शरीरे उपभोगणार्‍या नराधमाला जगात राहण्याचा काहीच अधिकार नाही असे माझे मत झाले होते. सविता एक व्याभिचारिणी आणि तिचा नवराही तसाच भ्रमर वृत्तीचा. दोघांनाही एकाच वेळी नरकाचे द्वार दाखवण्याचे मी ठरवले. मनात हिशोब केला – एकाच्या जागी दोन एवढाच फ़रक. शिवाय त्या गरीब मुलींचे लाचार झालेले निष्पाप चेहरेही माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतेच.
+ + +

१५ ऑगस्ट १९९५

आज देशाचा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी हे सत्कृत्य करताना मनाला खूप समाधान वाटत होते. दोघे नवरा बायको सिंहगडावर त्यांच्या कार मधून ट्रिपला जाणार होते. काल संध्याकाळी ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते आणि त्यांच्या बोलण्यातूनच हे मला कळाले होते. मला आपला हा सूड पूर्ण करण्याची संधी एवढ्या लवकर मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. मी भल्या पहाटेच उठून त्यांच्या फ़्लॅट पाशी आलो होतो. सावधपणे मी पार्किंग प्लेसमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या मारुती व्हॅनजवळ गेलो. आवाज न करता मी गाडीच्या खाली गेलो आणि स्वत:च्या कमरेस लावलेला टॉर्च हातात घेतला. टॉर्च छोटासाच होता पण माझ्या कामास पुरेसा होता. मी गाडीच्या ब्रेक वायर्सना माझी इलेक्ट्रॉनिक कात्री लावली. गाडीखालून बाहेर आलो तर कुठलसं एक कुत्रं मालकाला आपली इमानदारी दिसावी म्हणून माझ्यावर भुंकत आलं. मी त्याला दगड फ़ेकून मारला तसं केकाटत पळून गेलं. मग मी ही घरी आलो.
+ + +

सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. मी खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहत बसलो होतो. खरं तर मी पोहत नव्हतो. माझं सगळं लक्ष सिंहगड रोडवरुन येणार्‍या नेपच्यून ब्लू कलरच्या मारुती व्हॅन कडे लागलं होतं. पांढर्‍याची कार निळी हा एक विनोदच होता. आधी सविता नवर्‍याबरोबर वाटेतल्या एका हॉलिडे रिसॉर्ट वर जाणार होते. साधारण दहाच्या सुमारास नेपच्यून ब्लू कलरची मारुती व्हॅन सिंहगडाकडे जाताना मला दिसली आणि माझी शिकार आलीय हे मी लगेच ओळखले. सविताचा नवरा गाडी चालवत होता आणि सविता त्याच्या बाजूलाच बसली होती. त्यांनी बरोबर दुसर्‍या कोणाला आणले नव्हते हे बरेच झाले. कारण पापी लोकांपायी दुसर्‍या कोणाचा जीव जावा हे माझ्या मनाला पटले नसते. माझी शिकार सिंहगडावर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आनंदोत्सव साजरा करायला गेली आणि मी अगदी शांत चित्ताने पोहत बसलो. साधारणपणे पावणे बाराच्या सुमारास मी पाण्याबाहेर आलो. कपडे घालून मी माझ्या सायकलवरुन सिंहगडाकडे कूच केले तेव्हा माझ्या घड्याळात बरोबर बारा वाजले होते. सविता आणि सदाशिव पांढरे यांचेही बारा लवकरच वाजणार होते.

सिंहगडावर जाण्यासाठी दोन रस्त आहेत. एक रस्ता थेट पायथ्यापाशी जातो. हा रस्ता गिर्यारोहणाची आणि दुर्गभ्रमणाची आवड असणारे हौशी पर्यटक वापरतात. आणि दुसरा रस्ता थेट गडावर जातो जो फ़क्त सिंहगडाला एक सहलीचे ठिकाण मानणार्‍या लोकांनाच आवडतो. अर्थातच मी थेट सिंहगडावर जाणार्‍या रस्त्याची निवड केली. अगदी रमत गमत एका हातात सायकल घेऊन मी चालत होतो. मला हव्या त्या ठिकाणी पोहोचायला मला दुपारचे तीन वाजले होते. बरोबर खाण्यासाठी मी डबा आणि पाणी बरोबरच्या पिशवीत आणलेले होते. शिवाय चालून चालून मी पण बराच दमलो होतो. त्यामुळे दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पहिला मी पोटोबा केला. वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

+ + +


बसल्या बसल्या एखादा चित्रपट पहिल्यापासून सुरु होतो तशा भूतकाळातील सर्व घटना माझ्या डोळ्यांपुढून तरळू लागल्या. सविताने शाळेत सर्वांसमोर माझा जोकर केल्यानंतर दोन आठवडे माझा अगदी देवदास झाला होता... शेवटी तिला एकदा गाठायचे ठरवून मी तिच्या घरावर लक्ष ठेवताना एक दिवस ती कुठेतरी खरेदीसाठी म्हणून बाहेर पडताना दिसली. तिचा पाठलाग करत घरापासून पुरेशा लांब अंतरावर आल्यावर मी तिला गाठले. तसे सवितावर लक्ष ठेवण्याची आयडिया माझ्या डोक्यात या प्रसंगा नंतरच आली. माणुसकीच्या नात्याने विचार केला तर प्रेमभंगाच्या चुकीसाठी आपण एका व्यक्तीचे आयुष्य संपवणे काही योग्य नव्हे हे मलाही पटत होते. माणुसकी का सूड असे द्वंद्व मनात सतत चालू होते. मनाने सविताला एक संधी देण्याचे ठरवले. प्रेमात माणूस खूप आशावादी असतो हेच खरे. कदाचित तिला आपली चूक उमगेल आणि पुन्हा माझ्या प्रेमाचा स्वीकार करेन अशी मला एक वेडी आशा होती.

पण नाही....शेवटी विश्वासघातामुळे माझ्या मेंदूत धावत असलेल्या गरम रक्ताचाच विजय झाला.

झाल्या प्रकाराचा नाही म्हटले तरी मला खूप रागच आलेला होता. भावनेच्या भरात मी माझ्या प्रेमभंगाचा सूड घेण्याचा प्रण करुन बसलो होतो. तसा मी शांत डोक्याचा, पण पहिले प्रेम हे खूप नाजूक असते. आणि मला ज्या वयात पहिल्या प्रेमाचे हे फ़ळ चाखावयास मिळाले ते वयही तसे कोवळेच होते. सविताला सर्वस्व समजून मी मनाने तिच्यात पूर्णपणे गुंतलो होतो. पहिल्या प्रेमात बसणार्‍या विश्वासघाताचा फ़टका एवढा जबरदस्त होता की मी आतून पार कोलमडूनच गेलो होतो. आज सविताला याचा जाब विचारायचाच असे ठरवून तिला मी गाठले होते.

“सविता असे तू का केलेस? माझ्या प्रेमात काय कमी होती?”
“ए येड्या ...आलास का माझ्यामागे परत?... चल फ़ुट इथून मला त्रास देऊ नकोस.” सविता वैतागून म्हणाली.

“तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना पण मला सहन होत नाही सविता. माझे प्रेम तुला का नको याचे मला तू उत्तर दिलेच पाहिजेस. माझे प्रेम हे काही एकतर्फ़ी नव्हते... ते आपले प्रेम होते...त्यात...”

माझे बोलणे अर्धवट तोडत ती म्हणाली – “ ए भुक्कड ... तुझ्या अजून लक्षात नाही का आले? मुलांना खेळवणे हा माझा छंद आहे... मुलांनी माझ्या मागे लागलेले मला फ़ार आवडते. मग तुला काय वाटते याच्याशी मला काहीही देणं-घेणं नाही. यापुढे परत मला तुझं माकड थोबाड दाखवू नकोस”

मला फ़टकारुन सविता पुढे चालू लागली. एखाद्याला फ़सवणे वेगळे. पण फ़सवून मिजासीने तोंडावर सांगितलेले ऐकणे जास्त क्लेशदायक असते. माझ्या कपाळावरची शीर तडतड उडू लागली. रागाने मनावरचा ताबा जाऊ लागला. माझ्या खर्‍या प्रेमाचा अपमान मला अजिबात सहन झाला नाही.... आधी सविताने माझ्या थोबाडीत मारली होती तेव्हा अविचाराने मी ठरवले होते तिला धडा शिकवण्याचा...पण आता मात्र असह्य झाले होते. माझा आधीचा माणुसकीच्या दुविधेत सापडलेला विचार आता ठाम झाला होता...रागाच्या भरातच मी ओरडलो...

“सविता यापुढे एकदाच तुला माझे हे थोबाड दाखवेन... तेव्हा तुला पश्चाताप होईन ... नक्कीच होईन... पण तेव्हा वेळ गेलेली असेन एवढे लक्षात ठेव...” असे बोलून मी तेथून घरी निघून आलो आणि सूडाच्या तयारीला लागलो.
+ + +


हा प्रसंग आठवून माझे डोळे पाणावले होते पण ह्या आठवणीमुळेच माझी सूड घेण्याची इच्छादेखील तेवढीच प्रबळ झाली. मी पूर्ण तयारीत होतो. साडेपाच वाजता सदाशिवराव पांढरेंची मारुती व्हॅन खाली येताना दिसली. मी त्या महत्त्वाच्या यू टर्न वर उभा राहून त्यांचीच वाट पहात होतो. मी दोघांकडे एक नजर टाकली. दोघंही एकमेकांच्या अंगाशी झटे घेत आणि खिदळत होते. गाडी जरा कमी गतीने येत होती. मी केलेली कृती समजण्यासाठी आधी मी उभा असलेल्या स्थळाचे नीट वर्णन करणे आवश्यक आहे. सिंहगडावरुन खाली येण्यासाठी रस्ता सुरु झाला की चार पाच वळणांनंतर एक मोठा यू टर्न आहे. त्या स्पॉटला गाडी अगदी संथ गतीने न्यावी लागते. वेगात येणारी गाडी खोल दरीत कोसळल्याशिवाय राहिली नसती. कारण यू टर्न आधीचा रस्ता बराच उताराचा होता. तो उतार ब्रेक नसलेल्या गाडीला दरीत भिरकावून देण्याइतकी गती देण्यास पुरेसा होता.

गाडी जवळ आली. शेवटचे वळण घेऊन गाडी उताराला लागताच मी माझ्याकडच्या रिमोटचे बटन दाबले आणि मी गाडीच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावर पडलेली इलेक्ट्रिक कात्री उचलून मी खिशात टाकली. हो मला कोणताही पुरावा ठेवायचा नव्हता, म्हणून तर ही मेहनत घेतली होती. त्या दोन पापींच्या खुनाने जरी माझे हात बरबटणार असले तरी त्यांच्या संपणार्‍या आयुष्याबरोबर माझ्या आयुष्याची माती करण्यास मी तयार नव्हतो. मला तोपर्यंत गेली पाच वर्षे प्रतिक्षा करत असलेली सविताची किंकाळी ऐकू आली. मी धावत मागे वळून त्या यू टर्न पर्यंत गेलो. गाडी आपटत खाली जात होती आणि अचानक गाडीचा मोठा स्फ़ोट झाला. बहुतेक पेट्रोल ची टाकी एखाद्या दगडावर आपटून फ़ुटली असावी.

आणि हो एक सांगायचे राहिलेच. मी व्हॅनच्या दिशेने जाताना सविताला माझा चेहरा दाखवला होता. मला बघताच प्रचंड घाबरल्याचे भाव तिच्या चेहर्‍यावर मला एकदम स्पष्ट दिसले होते. त्यामुळे तर मला माझा सूड पूर्ण झाल्याचे मोठे समाधान मिळाले होते.

“सिंहगडावरुन मारुती व्हॅन खोल दरीत कोसळून एक नव-विवाहित दांपत्य निधन पावले” अशा आशयाची बातमी दुसर्‍या दिवशी सर्व वर्तमानपत्रांत झळकली होती. रोजच्याप्रमाणेच ही अपघाताची एक बातमी होती. इतरांनी तिला महत्त्व देण्याचे काहीच कारण नव्हते. पण माझ्या दृष्टीने मात्र त्या बातमीचे महत्त्व काही औरच होते. पाच वर्षांच्या खडतर कष्टाचे फ़ळ मला मिळाले होते. बातमी वाचून मोठमोठ्याने मी हसत होतो. पाच वर्षांनंतर प्रथमच मी एवढा मनसोक्त हसलो असेन.
(संपूर्ण)

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र त्यासंबंधित कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.

धन्यवाद,
सागर भंडारे

Sunday, April 19, 2009

शनिवारवाड्याचे रहस्य (संपूर्ण कथा)

शनिवारवाड्याचे रहस्य

-१-
रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो. "वेस्ट्-एन्ड" टॉकीजपासून मी निघालो. मी राहतो रास्ता पेठेत जाताना मला वाटले की थोडे वाकड्या वाटेने घरी जावे. म्हणून मी पॉवर हाऊसमार्गे के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोरुन जायला निघालो. अचानक माझे लक्ष हॉस्पिटलच्या दरवाज्याकडे गेले. एक व्यक्ती धडपडत माझ्या दिशेने येताना दिसली. मला काहीच कल्पना नव्हती, अचानक तो माणूस माझ्या अंगावर जवळ जवळ कोसळलाच. त्याने लगेच माझ्या हातात एक कागदाचा बोळा कोंबला. प्रकाशात मला दिसले की त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. मी धोका ओळखला व बाजूच्या भिंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तरी मी धाडस करुन एक दगड उचलला आणि रस्त्यावरचा सार्वजनिक दिवा फोडून टाकला. तेवढ्या भागापुरता तरी अंधार पसरलेला होता. माझ्या हातात कागदाचा बोळा कोंबून धडपडत पुढे पळालेला गृहस्थ आता अंगातील त्राण संपल्यामुळे जमिनीवर निपचित पडलेला होता. तेवढ्यात एक माणूस के.ई.एम्.च्या आतून पळत आला व रस्त्यावर पडलेल्या माणसाची तपासणी करु लागला. पुढे हा काय करतो? हे पाहण्यापूर्वीच मी तेथून पलायन केले. न जाणो आपण याच्या हाती सापडलो तर? मी जवळ जवळ घर येईपर्यंत पळतच होतो. घरापाशी आल्यावरच मी थांबलो. घरी येऊन कपडेही न बदलता मी झोपून गेलो एवढा मी घाबरलो होतो.....

-२-
दुसर्‍या दिवशी मी उशीरा उठलो. रविवार असल्याने आईनेही मला नेहमीप्रमाणे उठवले नाही. उठल्यावर मला जाणवले की काल रात्री कपडे न बदलताच झोपलो होतो. लगेच काल रात्रीचा सर्व प्रसंग मला आठवला. आपसूकच अंगावर शहारा आला. नकळतच माझा हात खिशात गेला. त्या माणसाने माझ्या हातात दिलेला कागदाचा बोळा तसाच अजून खिशात होता. तो मी उलगडला, एका बाजूवर शनिवारवाड्यासंदर्भात काहितरी लिहीले होते व दुसर्‍या बाजूला एका नकाशावर काही चिन्हे होती. नंतर नीट पाहू असे ठरवून मी उठलो. सर्व आवरुन मी शनिवारवाड्यावर जाऊन बसलो. म्हटले ज्या वास्तूचा उल्लेख कागदावर आहे त्याच ठिकाणी जाऊन पाहिलेले बरे असा विचार करुनच मी शनिवारवाडा गाठला होता.

शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच एक माडी आहे, ती माझी आवडती जागा आहे. तिथेच एका कोपर्‍यात बसून तो कागद मी वाचत होतो. त्या कागदाच्या पहिल्या पानावर (बहुतेक त्या माणसाने...) लिहिले होते की, "सन ११७६ मध्ये घडवलेली नटराजाची रत्नजडीत मूर्ती शनिवारवाड्यासमोरील बाजीरावाच्या पुतळ्याखाली आहे." मी बायनॉक्युलर (दूरदर्शी) आणला होता. त्यातून मी बाजीरावाच्या पुतळ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. बाजीरावाची घॉड्यावरची मर्दानी मूर्ती पाहताच अस्सल मराठी माणसाच्या नसा फुगल्याशिवाय रहात नाही. बाजीराव खूप पराक्रमी होता यात काही संशय नाही. पण दुर्दैवाने पहिला बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला. शत्रू हातातून सुटू नये म्हणून उभ्या घोड्यावरच हातावर हुरडा भरडून पोट भरुन परत लढाईला कूच करणार्‍या पहिल्या बाजीरावाच्या या कथा केवळ दंतकथा म्हणूनच आता ओळखल्या जातात. बाकी ही मस्तानी होती खूप सुंदर म्हणूनच बाजीरावासारखा रांगडा गडी तिच्यावर भाळला की काय न कळे. पण मस्तानीचेही बाजीरावावर तेवढेच प्रेम होते हेही तितकेच खरे. असो, तर मी माडीवरच्या कोपर्‍यातून बाजीरावाच्या पुतळ्याकडे पाहिले पण तेथे मूर्ती काही दिसली नाही. थोडे डॉके चालवल्यावर कळाले की एवढी मूल्यवान मूर्ती उघड्यावर कोणी ठेवणार नाही. ती बरोबर पुतळ्याच्याच जागी जमिनीखाली असणार. मी पुढे वाचू लागलो -
" ही मूर्ती देशाची मालमत्ता आहे. त्यामुळे मी ही अनमोल मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा विचार करतोय. मूर्तीकडे जाण्याचा नकाशा मागे दिला आहे. मी तर ही मूर्ती काढणे अशक्यच आहे, म्हणून कोणातरी विश्वासू व्यक्तीलाच ही माहिती देण्याचा मनसुबा आहे."
- वीरेन्द्र प्रताप सातव
१२ ऑगस्ट १९९२.



मी विचार करु लागलो, ज्याअर्थी हे पत्र अशा पद्धतीने लिहिले आहे त्याअर्थी खून झालेली व्यक्ती दुसरीच असावी. मी लगेच खाली गेलो व तेथे बसलेल्या विक्रेत्याकडून "सकाळ" व "केसरी" ही पुण्यातील दोन अग्रणी वर्तमानपत्रे विकत घेऊन आलो.मी एवढ्या घाईत घरुन निघालो होतो की न्यूजपेपर वरुन नजर फिरवायची देखील सवड मिळाली नव्हती. पेपर घेऊन मी शनिवारवाड्याच्या माडीवर परत आलो. अगदी पहिल्याच पानावर खुनाची सविस्तर बातमी आलेली होती. मी मन लावून ती सर्व बातमी वाचून काढली. ज्याचा खून झाला होता त्या व्यक्तीचे नाव होते रामदास जाधव. खून करणारा त्याचा भाऊच होता - सीताराम. एका गुप्त आणि प्राचीन मूर्तीची माहिती असलेला नकाशा रामदासकडे होता, म्हणून सीतारामने हा खून केला होता. आपला लहान भाऊ मेला आहे हे कळाल्यावर सीताराम स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. त्यामुळे पोलिसांचे काम संपल्यात जमा होते. पण माझे काम संपले नव्हते, कारण त्या नकाशाचे उत्तरदायित्व आता माझ्याकडे होते. मला ती मूर्ती शोधून काढून सुखरुपपणे पुरातत्त्व खात्याकडे सुपुर्त करायची होती. खूनाचा साक्षिदार म्हणून मी जाणारच नव्हतो, आणि आता तशी गरजही नव्हती. मी घड्याळात पाहिले. नऊ वाजून चाळीस मिनिटे झाली होती. मी खाली उतरलो व शनिवारवाड्याच्या शेवटच्या बाजूस असणार्‍या बंद असलेल्या भुयाराच्या दरवाजाच्या जवळ जाऊन बसलो.

-३-
बरोबर दहा वाजता एक माणूस आला व भुयारात जाणार्‍या लोखंडी दरवाज्याचे कुलुप काढून आत गेला. तसे होणार हे मला माहित होते. कारण कॉलेज मधे असताना कॉलेजचे रटाळ तास बुडवुन आम्ही सगळे मित्र इथे शनिवारवाड्यातच येऊन अभ्यास करायचो. तेव्हा दररोज सकाळी १० वाजता एक माणूस भुयारातील पाण्याची मशीन चालू करायला यायचा. या माहितीचा आज अशा वेळी उपयोग होईन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर नेहमीप्रमाणेच आजही तो माणूस आला व भुयाराचे कुलुप उघडून आत गेला. आजूबाजूला पहात मी भुयाराजवळ आलो. कोणी आपल्याकडे पहात नाही याची खात्री करुन मी भुयाराच्या दारातून प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे दोन फाटे फुटतात. मशीन सुरु करायला तो माणूस डावीकडे वळाला होता. मला बाजीरावाच्या पुतळ्याखाली जायचे असल्यामुळे मला उजवीकडेच जायचे होते त्याप्रमाणे मी उजवीकडे वळालो. शनिवारवाड्याच्या भुयारांबद्दल एक आख्यायिका आहे. शनिवार वाड्यातून एक भुयार थेट पर्वतीपर्यंत जाते आणि दुसरे भुयार रास्ता पेठेतील रास्तेवाड्यात उघडते. सध्या रास्तेवाड्यात शाळा चालू आहे, तरी शाळेच्या पायर्‍यांपाशीच एक खूप मोठे लोखंडी दार आहे जे कायम कुलुपबंद असते. पर्वतीवरही कायम कुलुपबंद असलेले एक दार आहे. आज या दंतकथेवरील पडदा उघडणार का? असे अनेक विचार मनात येत होते. पुढे खूप अंधार होता. खालच्या बाजूला उतरत जाताना पुढे काय घडणार? हा प्रश्न माझ्या मनात उत्कंठाही निर्माण करत होता आणि भीती देखील.

मी नेहमी एक छोटासा कि-चेन टॉर्च जवळ बाळगायचो, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून. आज तो छोटासा टॉर्च उपयोगाला आला होता. सुरुवातीचे अंतर मी दबकत दबकत टॉर्च न पेटवता चालत होतो कारण मशीन चालू करायला आलेल्या त्या माणसाला टॉर्च चा प्रकाश दिसण्याचा संभव होता. काही अंतर गेल्यावर मला थोड्या ओबडधोबड पायर्‍या पायाला लागल्या. तोल जाईन म्हणून मी टॉर्च पेटवला. पायर्‍या एकूण पाच होत्या. खाली उतरल्यावर एकदम माझ्या पायांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. माझे दीड हजार रुपये किंमतीचे बूट पूर्णपणे बुडुन पाणी माझ्या घोट्याला लागले होते. मी टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फेकत पुढे निघालो. अधून मधून नकाशाही पहात होतो. नकाशात असलेल्या खुणा टॉर्चच्या प्रकाशात शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पहिली मुख्य खूण शनिवारवाड्याच्या दरवाज्यापाशी होती. त्यामुळे मला खूप पुढे जावे लागले. बर्‍याच वेळाने मला असे वाटले की मी आता शनिवारवाड्याच्या प्रासिद्ध पोलादी दरवाज्याखाली आहे. पहिली खूण सूर्याची होती.... " " अशी. टॉर्चच्या प्रकाशात मला ती खूण सापडायला थोडे कष्टच पडले. कारण ती खूण नेमकी माझ्या डोक्यावर होती व मी आजूबाजूला शोधत होतो. पुढे भुयाराने डावीकडे वळण घेतले होते.

पुढची खूण होती चंद्राची.. "". या दोन्ही खुणा शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या आहेत हे मला त्यावेळी आठवले.मी हळू हळू पुढे जात होतो. एकेक खुणा सापडत होत्या. हा नकाशा नसता तर शनिवारवाड्याच्या पोटात असलेल्या भुयारांच्या भुलभुलैय्यात मी कुठे हरवलो असतो कोण जाणे.

-४-
भुयारांतून वळणे घेत घेत मी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. नकाशात एक खूण होती "". ही खूण दगडात अवघड जागी कोरलेली मला सापडली. नकाशातला रस्ता डावीकडे वळायचा संकेत देत होता व प्रत्यक्षात भुयाराचा मार्ग उजवीकडे जात होता. माझे डोके खजिना शोधाच्या साहसकथा वाचून बरेच सुपीक झाले होते त्यामुळे मी लगेच ओळखले की येथे गुप्त द्वार आहे. मी खुणेचे टॉर्चच्या अंधुक प्रकाशात नीट निरीक्षण केले व खुणेतील गोलाकार फुगीर असल्याचे जाणवले. तो फुगीर गोल भाग दाबताच समोरची भिंत आवाज करत मधोमध दुभंगली व माझ्यासाठी डाव्या बाजूने जायचा मार्ग मोकळा झाला. मी आत पहात हळूच प्रवेश केला. एव्हाना पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले होते व माझी आवडती डेनिमची पॅन्टदेखील खराब झाली होती. मी आत प्रवेश केल्याकेल्या एक रिकामा चौथरा माझ्या दृष्टीस पडला. त्यावर मूर्ती नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला की काय असे वाटून मी निराश झालो. कोणी घेतली असेन याचा विचार करत मी खिन्न होऊन बसलो होतो. मी एकदम माझ्या घड्याळाच्या आवडत्या ट्यूनने भानावर आलो. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या चौथर्‍याची तपासणी करु लागलो. तपासणी करताना कोणती कळ दाबली गेली न कळे पण चौथर्‍याची फरशी आपोआप बाजूला झाली. त्या चौथर्‍याच्या आत टॉर्चचा प्रकाश न टाकताही ती रत्नजडीत मूर्ती मला लगेच दिसली कारण मूर्तीची सर्व रत्ने खूप चमकत होती. बहुतेक ते सर्व हिरे असावेत असे वाटले, कारण रत्न ओळखण्याइतपत ज्ञान मला नव्हते. फक्त हिरा अंधारात चमकतो एवढेच मला माहित होते. मी माझ्या पाठीवरची सॅक काढली. मी पोहायला चाललो आहे असे आईला सांगून बाहेर पडलो होतो. त्यामुळे सॅक मधे टॉवेलदेखील आणलेला होता मी. तर सोबतच्या टॉवेलात इतिहासातील तो अनमोल रत्नजडीत मूर्तीचा ठेवा काळजीपूर्वक गुंडाळला. मूर्ती सॅकमधे ठेवून मी घड्याळाकडे एक नजर टाकली. माझ्या घड्याळाचे रेडीयमचे काटे अंधारात ११.०५ ही वेळ दाखवत होते. मूर्ती जड होती व त्यात मला पाण्यातून चालायाचे असल्यामुळे थोडा त्रास झाला. पण मी सुखरुपपणे भुयाराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो .

-५-
दाराला परत कुलूप लागलेले होते. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे तो माणूस ११ वाजता कुलूप लावून निघून गेला होता. खिशातून काही मिळते का ते मी पाहू लागलो. हेरगिरीच्या व साहसे करण्याच्या स्वभावापायी मी अनेक वस्तू जमवून ठेवल्या होत्या त्यात अनेक चाव्यापण होत्या. खिशात काही नाही मिळाले पण माझ्या सॅकमधे हा चाव्यांचा जुडगा होता. मी कुलुपाचे निरिक्षण केले. ते छोटेसे व साधेच कुलूप होते. माझ्याकडच्या चाव्यांपैकी एका चावीने ते छोटेसे कुलूप जास्त कष्ट न करता माझ्या सुदैवाने सहजपणे उघडले गेले. बाहेर जाताना मुख्य दरवाजावरील कर्मचारी विचित्र व हेटाळणीच्या नजरेने पहात होता. बरोबर होते त्याचे. गुढग्यापर्यंत पॅन्ट पूर्णपणे भिजलेली, अंगावर असलेली माती, असा माझा अवतार पाहून कोणीही असेच पाहिले असते. तर मी शनिवारवाड्याबाहेर जाताच पहिल्यांदा पब्लिक टेलिफोन बूथ गाठला. सुदैवाने सुटी नाणी होती माझ्याकडे. मी सर्वप्रथम पुण्याच्या महापौरांना फोन केला व थोडक्यात माझा हा उद्योग कळवला आणि पुरातत्त्व खात्याच्या इमारतीत यायची विनंती केली.

मी भांडारकर रस्त्यावरील पुरातत्व खात्याच्या इमारतीत पोहोचेपर्यंत महापौरदेखील आलेले होते. मी येताच महापौरांनी मला जवळ घेऊन माझे खूप कौतुक केले. मूर्तीची माहिती समजताच सर्व वर्तमानपत्रांचे वार्ताहरही आलेले होते. ती रत्नजडीत मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. मी शांतपणे घरी परतलो. घरी येई पर्यंत संध्याकाळ झालेली होती. खूप थकलो असल्याने मी रात्री लवकर झोपलो...

दुसर्‍या दिवशी सकाळी पेपर मध्ये पहिल्या पानावर माझ्या पराक्रमाची सविस्तर हकिकत आलेली होती. अगदी ती रत्नजडीत मूर्ती व महापौर यांच्यासोबत काढलेल्या फोटोसकट. पेपर पाहूनच आईने मला साखरझोपेतून उठवले व म्हणाली- कार्ट्या असे उद्योग करायला उलथला होतास होय? पण गुणाचं ते माझं पोर"... म्हणून आईने मला जवळ घेतलं ...
एका रात्रीत मी सार्‍या पुण्यात फेमस झालो होतो. मला मात्र एका मोठ्या रहस्यावरचा पडदा उघडल्यावर सहजच एक डायलॉग आठवला. माय नेम इस बॉन्ड ... जेम्स बॉन्ड... हा हा...
-सागर

http://sagarkatha.blogspot.com/
(© १९९२ - २००९, सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.या कथेतील कोणताही भाग किंवा कोणतीही कल्पना कोणत्याही कारणासाठी वापरण्यासाठी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे)

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.
धन्यवाद ,
सागर

Friday, February 20, 2009

माझी लघुकथा ????

http://www.misalpav.com/node/6174

एकदा मिसळपाव.कॉम वर एका वाचकाने ६ ओळींची लघुकथा लिहिण्याचे आव्हान दिले...म्हटले चला लिहू, त्यात शब्दांची मर्यादा नव्हती... ... तेव्हा मी म्हटले ६ पेक्षा कमी ओळींची भली मोठी कथा लिहू या... त्या कल्पनेतून साकार झालेली ही कथा

अट अशी होती की शेवटचे वाक्य "हेच मला भारतातील आवडत नाही"

अथवा

"म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे"

यापैकी हवे होते

माझी लघुकथा ????

एकदा एका जंगलातून वाघाच्या पाऊलखुणांच्या मागावर जात असताना अचानक कोकीळेची तान ऐकून इकडे तिकडे पाहताना समोरच्या सरोवरात जलक्रिडा करणार्‍या अप्सरेकडे राजाचे लक्ष जाताच त्याने ठरवले की ह्याच सुंदरीच्या चरणी आपले जीवन अर्पून तिच्याबरोबर केलेल्या सुखाच्या संसाराने आपल्या कुटुंबाचा वृक्ष फुलवता आला तर प्रयत्न करुयात असे ठरवून तो तिच्याजवळ जाऊन त्या सुंदर अप्सरेला म्हणाला की हे सुंदरी तू खूप सुंदर असून माझे चित्त हरपून टाकण्यास कारणीभूत झाल्या कारणाने माझी तुजवर प्रीती जडल्यामुळे तू माझे प्रेम स्विकारावे अशी माझी इच्छा असून माझ्या मुलांची आई जर तू झालीस तर मी तुझा खूप ॠणी तर होईनच पण त्याचबरोबर स्वर्गात मिळणार्‍या सुखापेक्षा जास्त सुख तुला माझ्याकडून मिळेल यासाठी मी अगोदरच एक सांगू इच्छितो की मी या अमरावती नगरीचा तरुण राजा असून मी अविवाहित असल्याकारणाने योग्य वधूच्या शोधात यश न मिळाल्याने जंगलात शिकार करण्यासाठी आलो असताना मी तुला पाहिले आणि तुझ्या सौंदर्याने मज घायाळ करुन तुझा दास होण्याचीच आता माझी इच्छा असल्यामुळे हे सुंदरी तू माझी हो अशी तुला विनंती करण्यासाठी मी येथे आलो आहे , असे सांगून राजा तिच्या आरस्पानी सौंदर्याचे डोळ्यांनी निरिक्षण करत असताना अप्सरेने ओळखले की राजा आपल्या सौंदर्यावर पूर्ण लुब्ध झाला असल्यामुळे आता आपला हेतू साधता येईन असे ठरवून तिने राजाला सांगितले की हे राजन मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी आणि तुला संसारसुख देण्यासाठी तत्पर आणि तयार आहे यात तू शंका बाळगावी असे काहीही नसल्याकारणाने माझ्या २ अटी मी सांगत्ये त्यांची पूर्तता झाली की लगेच मी तुझ्याशी लग्न करुन तुझ्या संसाराचा सुखी वृक्ष फुलवेन हे माझे वचन समजून त्यासाठी तू मला सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्या पक्षाच्या गळ्यातील लाल माणिक आणून दे म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करेन आणि... पुरे पुरे आता मी तुझ्याकडे तेव्हाच येईन जेव्हा माझ्याकडे सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्याच्या गळ्यातील लाल माणिक घेऊन मी तुझ्या गळ्यात त्याचा हार करुन घालेन तेव्हाच मला तू वरमाला घालशीन याची मला कल्पना असल्याने मी निघतो आता" असे म्हणून राजा सुवर्णपर्वतावर एकटा तर गेलाच पण अप्सरेच्या अटीप्रमाणे दोन्ही गोष्टी खूप पराक्रम करुन घेऊन येत असताना मनात राजा म्हणाला आपण उत्साहाच्या भरात त्या सुंदर अप्सरेचे नावही विचारले नाही तर आता तिच्या आठवणींना काय नाव देऊ असा विचार करतो न करतो तोच ती अप्सरा उडत येताना दिसताच राजाने हर्षोल्ल्हासित होऊन अप्सरेला नाव विचारायचे ठरवले होते तोच अप्सरा म्हणाली राजन चिंता नसावी ही तिलोत्तमा अप्सरा आता फक्त तुमचीच झाली असल्याने आता त्वरीत आपण राज्याकडे प्रस्थान करुन आपल्या प्रजेला ही आनंदाची बातमी देऊन मोठा सण साजरा करुयात.


राजा नगरात येताच प्रजेला नवीन आणि सुंदर राणी तिलोत्तमेच्या रुपाने मिळाल्यावर प्रजाजन खुश झाले होतेच पण राजाही सातव्या अस्मानात होता असे तिलोत्तमेला वाटत असल्याचे राजा मनोमन जाणून असल्याकारणाने त्याने लगेच तिलोत्तमेला पट्टराणी आणि तिच्या पोटी होणार्‍या अपत्याला राज्याचा वारस घोषित केल्याबरोबर प्रजाजन आनंदाने नाचू लागल्याचे पाहून तिलोत्तमा लाजून महालात पळाल्यामुळे राजाचा नाईलाज होऊन तोही आत महालात गेला.


पाच वर्षात राजाला तिलोत्तमेने वचन दिल्याप्रमाणे राजकुमार रत्नसेन आणि राजकुमारी सोनलता ही दोन अपत्ये तर दिलीच पण सोनेरी पक्षी आणि लाल माणिक रत्न यांच्या अनुषंगाने त्यांची नावेही तशीच ठेवली.


आता सोनेरी पक्षी आणि माणिक यांचे रहस्य काय हे जाणून घेण्यात वाचकांना सगळ्यात भारी इंटरेस्ट असल्यकारणाने मी वाचकांना एकच सांगू इच्छितो की असल्या ५ वाक्यांची लघुकथा मी कितीही लांबवू शकलो असतो पण स्वतःचे डोके या कामी खर्च करण्यापेक्षा मला वाचणार्‍या तुम्हा सगळ्यांच्या वेळेची किंमत असल्याकारणाने माझी ५ वाक्यांची कथा इथेच थांबवतो व एकच निदर्शनास आणून देतो की बुद्धिमत्ता आपण कुठेही खर्च करतो.........

हेच मला भारतातील आवडत नाही.


(लघुकथाकार ) सागर (मी एक ओळ वाचवली .... हा हा हा)